राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 20, 2025

दिन दिन दिवाळी 🎆🎇💥🌠

दिवाळी हा आपल्या सर्वांचा आवडता आणि महत्त्वाचा सण. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. दिव्यांचा झगमगाट, लखलखते आकाश कंदील, सर्वत्र रोषणाई म्हणजे दिवाळी सण.पणत्या, रांगोळ्या, दारावरील तोरणे, नवीन कपडे, तिखट - गोड फराळ आणि सर्वांचा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी.
     हिंदू धर्मात या सणाचे खूप मोठे महत्त्व आहे. भगवान श्रीराम जेव्हा रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन काळापासून साजरा होत असलेला दीपोत्सव आजही सर्वत्र तितक्याच जोमाने साजरा होताना आपण पाहतो.
    दसरा साजरा झाला की लगेचच सर्वजण दिवाळीच्या तयारीला लागतात. घर सजवणे, नवीन वस्तू, कपडे खरेदी करणे, एक ना अनेक गोष्टींची लगबग सुरू होते. आता तर या सणाला जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातील आपले भारतीय लोक आपापल्या ठिकाणी दिवाळी साजरी करताना दिसून येत आहेत. अमेरिका, लंडन मलेशिया, म्यानमार, सिंगापूर ऑस्ट्रेलिया, मॉरिशस इत्यादी व अन्य काही देशांमध्ये दिवाळी साजरी होत आहे. दिवाळीच्या सुट्टीत भारतीय संस्कृतीवर आधारित काही कार्यक्रम सादर होतात. काही प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाते. आपल्याकडे तर साहित्य क्षेत्रात देखील दिवाळी अंक प्रकाशित करून दिवाळी साजरी केली जाते.
        दिवाळी साजरी करत असताना प्रत्येक दिवसाचे असे विशेष महत्त्व सांगितले जाते. वसुबारस पासून दिवाळी साजरी करायला सुरुवात होते. या दिवशी गायीची पूजा केली जाते. गाईला गोग्रास दिला जातो. गाईच्या शेणापासून गवळणी घातल्या जातात, गवळणी भोवती रांगोळी काढली जाते, फुलांनी सजवले जाते. पाचव्या दिवशी पाच पांडव तयार केले जातात. बळीराजा पण तयार केला जातो. वेगवेगळ्या आकारात गवळणी तयार केल्या जातात. परंतु; सध्या ही प्रथा लोप होत चाललेली आहे.अगदी क्वचितच खेडोपाड्यात ही प्रथा जोपासताना पहावयास मिळत आहे.
    धनत्रयोदशी दिवशी घरातील धनाची पूजा केली जाते. हळूहळू थंडी वाढत असते. अशावेळी उटणे दुधात किंवा तेलात मिसळून त्याचा सुगंधी  लेप लावून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केले जाते. अभ्यंग स्नान होताच कणकेपासून तयार केलेल्या मुटक्यांनी दृष्ट काढून ओवाळले जाते.
          लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा केली जाते. आपल्या घरातील संपत्ती पूजनीय मानली जाते. धनाचा अधिपती कुबेर व देवी लक्ष्मी यांची पूजा म्हणजे घरातील मंगलमय वातावरणाची बरसातच असते.
         भगवान विष्णूंची बळीराजाच्या अवतारातील पूजा म्हणजेच बलिप्रतिपदा. याला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो ",असे म्हटले जाते.
     भाऊ - बहिण यांचे नाते दृढ करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. " दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ...."असे म्हणत बहीण भावाला ओवाळत असते.
        असा हा पाच दिवसांचा दिवाळी सण नवचैतन्य निर्माण करत असतो. सर्व कुटुंबीयांना आनंदाने एकत्रितरित्या एकमेकांच्या नात्यांची जाणीव करून देणारा हा सण. प्रत्येक नात्यातील गोडवा जपणारा हा सण. परंतु हल्लीच्या या ऑनलाइनच्या जमान्यात थोडासा धावताच झाला आहे. हौस -  मौज करणे, हुल्लडबाजी करणे, पैशाचा दिखावा करणे, पैशांची उधळपट्टी करणे अशा प्रकारे सण साजरा करणारा एक वर्ग समाजात तयार झालेला पहावयास मिळत आहे.     
    दिवाळीच्या सुट्टीला गावाकडे जाणारी मंडळी आता सुट्टी कमी आहे, यावेळी गावाकडे यायला जमणार नाही असे सांगून बाहेर पर्यटन स्थळी फिरायला जायचे नियोजन करत असते. फिरायला हरकत नाही. वर्षभराच्या कामातून तेवढाच थोडासा विरंगुळा,पण; गावाकडे असणाऱ्या आपल्या आई-वडिलांनाही त्यात सामील करून घेतले तर हा आनंद द्विगुणीतच असणार आहे. नाही सामील करून घेता आले तरी निदान एक दिवस तरी गावाकडे दिवाळीला जाऊ शकतोच ना! पण हल्ली आम्हांला अशा प्रकारची धावपळ नको असते. तसेच मित्र मैत्रिणींना देखील भेटायचे असते. घरातील फराळापेक्षा मिठाईच्या दुकानातील मिठाई एकमेकांना भेट देणे आम्हाला प्रतिष्ठेचे वाटते. गावाकडची मंडळी मात्र लाडू , चिवडा, करंजी एकमेकांना देऊनच गोडवा जपते. आणि त्यांचा हा गोडवाच एकमेकांचा आधार असतो.
              जो - तो आपापल्या परिस्थितीप्रमाणे हा सण साजरा करत असतो. परंतु; यंदाचे काय? आपला गरीब मायबाप शेतकरी यंदाच्या पावसाने पुरता बुडाला आहे. पुराचे पाणी शेतात आल्याने सर्व पिके वाहून गेली आहेत. तोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला आहे. पिकांबरोबरच काही शेतकऱ्यांची घरे देखील भुई सपाट झाली आहेत. पुढे काय होणार? हीच आशा प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत आहे.पाणी जरी ओसरलं असलं तरी शेतात बघायला पीकच उरलं नाही. घोर निराशा मनामध्ये दाटून आली आहे.सर्व आशेचे बांध फुटले आहेत.नव्याने सर्व संसार उभा करावा लागणार आहे. अशावेळी आपल्या शेतकरी मित्राला,पूरग्रस्तांना खचू न देता त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम आपण केले पाहिजे. आता गरज आहे त्यांना सावरण्याची, मानसिक आधार देण्याची, त्यांचे मनोबल वाढवण्याची. त्यांचे पीक,  वाहून गेलेले सामान आपण कोणीच परत करू शकत नाही. पण ; अशावेळी शाब्दिक आधार तरी नक्कीच देऊ शकतो.दिवाळीच्या तोंडावर आज अशी परिस्थिती ओढवली आहे.
         मित्रांनो जरा विचार करा.  आज अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे.याचे कारण आहे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. याला कारणही तसेच आहे. आपण मनुष्य प्राणी स्वतःच्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहोत, शेती तर बुडीतच होत चालली आहे, अनेक ठिकाणी शेतीच्या जागी मोठ-मोठे कारखाने उभे करत आहोत, धुराचे नळकांडे जागोजागी वाढवत आहोत. फटाक्यांची आतषबाजी, त्यांचा तो नकोसा धूर प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत. मग का नाही निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळणार.
    " दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी"  या ओव्या जर म्हणायच्या असतील तर निसर्गाला साथ द्या. निसर्गाच्या उलटे जाऊ नका. मानवी स्वार्थ साधाल तर निसर्ग संकटातून कोणाची सुटका नाही हे लक्षात ठेवा. सर्वांनाच दिवाळीचा आनंद लुटू द्या. 
 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*शब्दांकन* ✍️✅🇮🇳
सौ.मिनल अमोल उनउने - सातारा
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Tuesday, October 14, 2025

अहिल्यानगर शहरात स्त्रीमुक्तीचा गजर


स्त्रियांच्या चळवळीमुळे स्त्रीजीवनात
 मोठे परिवर्तन झाले - मनिषा गुप्ते

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद आणि सी एस आर डी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या घोषणेला पन्नास वर्षे झाल्यानिमित्ताने नगर मध्ये आयोजित महिला परिषदेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या मनिषा गुप्ते यांनी गेल्या पन्नास वर्षातील स्त्रियांच्या चळवळीचा आढावा घेतला. "स्त्रियांच्या चळवळीमुळे स्त्रीजीवनात मोठे परिवर्तन झाले आहे. हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्यासाठी स्त्री पुरुष समतेच्या मूल्यावर विश्वास ठेवून संविधानाच्या आधारावर काम करायला हवे",असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
परिषदेचे उद्घाटन सीएसआरडी प्राचार्य सुरेश पठारे यांनी केले. स्त्रियांच्या चळवळीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे नेत काम केले आहे असे सांगून त्यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या.
अहिल्यानगर येथील पोलिस भरोसा विभागाच्या प्रमुख प्रियंका आठरे यांनी भरोसा सेल च्या कामाविषयी माहिती दिली.
"सर्व धर्मीय समाजाच्या एकात्मतेच्या वातावरणातच स्त्रियांच्या चळवळीला सामर्थ्य मिळते. भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यावर विश्वास ठेवत स्त्रियांमधील भगिनीभाव वाढवणे हे चळवळीचे कार्य आहे"असे परिषदेच्या अध्यक्ष ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या साथी ॲड. निशा शिवूरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
परिषदेच्या प्रास्ताविकात नीलिमा जाधव बंडेलू यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील चळवळींचा वारसा आपण पुढे न्यायला हवा, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुण्या कॉ. लता भिसे यांनी महाराष्ट स्त्रीमुक्ती परिषदेच्या वाटचालीचा , विविध मोहिमांविषयी भाषणात सांगितले." एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन स्त्री चळवळीला कार्य करायचे आहे." असे विचार त्यांनी व्यक्त केले. 
डॉ.रमेश अवस्थी आणि कॉ. स्मिता पानसरे यांनी हिंसेच्या विविध पैलूंवर उपस्थित प्रतिनिधींमध्ये चर्चा घडवून आणली. सर्व प्रकारच्या हिंसेविरोधात एकत्र काम करण्याची गरज या चर्चेत सहभागींनी व्यक्त केली.
ॲड. निर्मला चौधरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींच्या प्रश्नाची मांडणी केली. 
शाहीर प्रवीण सोनवणे आणि साथींनी चळवळींची विविध गाणी सादर केली. संध्या मेढे यांनी आभार मानले.
परिषदेच्या यशस्विते साठी संध्या मेढे, ॲड निर्मला चौधरी, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, भैरवनाथ वाकळे, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे, सुरेखा आडम, बेबीताई जाधव शांताराम गोसावी, मंगला भावसार, सरोज आल्हाट, स्मिता पानसरे इत्यादींनी प्रयत्न केले. परिषदेला स्त्री पुरुष प्रतिनिधींची मोठी संख्या होती.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीदखान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी मैदानात उतरणार !


नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांत उमेदवार देणार – जोएफ जमादार यांची घोषणा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
समाजवादी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार आबु असिम आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागात पक्षाचे स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले जाणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी दिली आहे. 

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधारी पक्षांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत “श्रीरामपूर शहराच्या विकासाला नवीन दिशा देणे हेच आमचे ध्येय आहे,” असे स्पष्ट केले.

गेल्या चार वर्षांपासून नगर पालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या अनेक मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असून विकासकामे ठप्प झाल्याचे जमादार यांनी सांगितले. नागरिकांना आजही शहराच्या काही भागात नळांमधून गटारीचे दुर्गंधीयुक्त मलमिश्रित घाण पाणी पिण्याची वेळ येते ही मोठी शोकांतिका आहे, त्यावर रस्त्यांची अवस्था देखील खुपच दयनीय आहे, नालेसफाई नियमित होत नसल्याने स्वच्छतेबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी कोणतीही दखल घेतली जात नाही.

जमादार पुढे म्हणाले की, “आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत प्रश्नांवर कधीच आवाज उठवला नाही. ते निवडणुकीच्या काळातच जागे होतात आणि मतदारांचे उंबरे झिजवून पुन्हा पाच वर्षे मौन धारण करतात. परंतु समाजवादी पार्टी मात्र नेहमीच लोकांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देत आली आहे आणि पुढेही देत राहील.”

समाजवादी पार्टी गेल्या काही वर्षांपासून श्रीरामपूर शहरात संघटनात्मक पातळीवर सक्रिय असून युवक, महिला आणि कामगार वर्गाशी थेट संपर्कात आहे. स्थानिक पातळीवरील नागरी प्रश्न — पाणीटंचाई, स्वच्छता, रस्ते, घरकुल, आरोग्य आणि शिक्षण — यावर पक्ष सातत्याने भूमिका मांडत आला आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

जमादार यांनी स्पष्ट केले की, समाजवादी पार्टी ही कोणत्याही सत्ताधारी किंवा विरोधी गटाच्या आहारी न जाता स्वतःची स्पष्ट विचारसरणी आणि विकासाचा ठाम दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहे. “आमचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नाही, तर शहरातील सामान्य नागरिकांना न्याय देणे, त्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणे हा आहे,” असेही त्यांनी म्हटले.

आगामी काळात पक्षाच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू होणार असून प्रत्येक प्रभागात लोकाभिमुख, स्वच्छ प्रतिमेचे आणि कार्यक्षम उमेदवार उभे करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच युवकांना राजकारणात सहभागी करून शहराच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असेही जमादार यांनी सांगितले.

शहरातील अनेक समाजघटक, व्यावसायिक आणि तरुण वर्ग या निर्णयाचे स्वागत करत आहेत. अनेकांच्या मते, समाजवादी पार्टीचा प्रवेश स्थानिक राजकारणात नवीन स्पर्धात्मकता निर्माण करेल आणि मतदारांना पर्याय उपलब्ध करून देईल.

“सत्तेत आल्यास आम्ही श्रीरामपूरला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि प्रगतिशील शहर बनवू. शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा या सर्व प्रश्नांवर ठोस कृती आराखडा तयार करण्यात येईल,” असे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.

नगर पालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिली तयारी बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर प्रचार धोरण, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व मतदार संपर्क मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याचेही यावेळी श्री.जमादार यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, October 11, 2025

काकर समाजाच्यावतीने लवकरच जळगांव मध्ये भव्य शिक्षण फेस्टिवलचे आयोजन !

उत्कृष्ट कार्य असणाऱ्यांचा सन्मान ; माहिती पाठविण्याचे प्रदेशाध्यक्ष काकर यांचे अवाहन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र काकर समाज संघटना राज्य कार्यकारणी ची सभा नुकताच जळगांव याठिकाणी संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी काकर समाज संघटने चे प्रदेशाध्यक्ष तथा वैजापुर नगर पालिके चे माजी नगरसेवक हाजी बिलाल हुसैन काकर हे होते. या बैठकीत काकर समाजातील शैक्षणिक प्रगति विषयी चर्चा करण्यात आली. सामाजातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी,तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण यासोबतच शैक्षणिक विषयी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागळातील सर्वात शेवटच्या उपेक्षित
घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लवकरच जळगांव मध्ये भव्य शिक्षण फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष बिलाल काकर यांनी दिली.

याप्रसंगी जळगांव चे निसार मेहबूब काकर,मुस्ताक गुलाब काकर, तौसीफ शरीफ काकर, मोहम्मद असीम सर, रियाज वजीर काकर, अंजुमन तालीमूल मुस्लिम हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक फारूक अमीर काकर, माजी मुख्याध्यापक तथा इन्कलाब उर्दू पत्रिकेचे वरिष्ठ पत्रकार मुश्ताक करीमी काकर, मुख्याध्यापक इस्माईल सुलेमान काकर आणी श्रीरामपूर चे इकबाल इस्माईल काकर सर आदि उपस्थित होते. 

         यावेळी महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमीच्या वतीने मुश्ताक करीमी काकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व पत्रकारिता पुरस्कार तसेच श्रीरामपूर येथील काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा अलमिजान उर्दू शाळेचे शिक्षक इकबाल इस्माईल काकर यांना राज्यस्तरीय शैक्षणिक व सामाजिक पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र काकर समाज संघटनेच्या वतीने त्यांचा शाल,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

       काकर समाजाची अधिकाधिक शैक्षणिक प्रगती व्हावी याकरिता तसेच सामाजातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन तथा प्रोत्साहन देण्यासाठी काकर समाज संघटनेच्या वतीने लवकरच जळगांव येथे भव्य शिक्षण फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले.यासोबतच या शैक्षणिक फेस्टिव्हलमध्ये, सामाजातील शिक्षण क्षेत्रातील राज्यभरात उत्कृष्ट कामगीरी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे प्रोत्साहनपर सत्कार,सन्मान करण्यात येणार असल्याने, ज्यांचे कार्य आणी कामगीरी उत्तम आहे अशा मान्यवरांनी 
इकबाल इस्माईल काकर सर, इस्माईल सुलेमान काकर, मुशताक करीमी, फारुख काकर सर यांच्याशी संपर्क साधून आपली माहिती प्रत्येक जिल्ह्यातून त्यांच्याकडे पाठवावी असे आवाहनही महाराष्ट्र काकर समाज संघटना प्रदेशाध्यक्ष बिलाल हुसैन काकर यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्ध सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


भारतीय वायु दल चा ९३ वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा !


भारतीय वायु दल चा ९३ वा वर्धापन 
दिवस मोठ्या उत्साहात साजरा !

- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहर आणी तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीने भारतीय वायु दल चा ९३ वा वर्धापन दिवस श्रीरामपूर शहरातील शहिद स्मारक या ठिकाणी

मा.प्राध्यापक भास्करराव निफाडे यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र वाहून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख मा.प्राध्यापक भास्करराव निफाडे आपल्या मनोगतात म्हणाले की, भारतीय वायु सेनेची स्थापना दि.८ ऑक्टोबर १९३२ रोजी (ब्रिटिश कालीन) भारतात झाली. त्याकाळी त्याचे नाव रॉयल इंडियन एयर फोर्स असे देण्यात आले होते व १९४७ साली आपला भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर या दलाचे नाव बदलून भारतीय वायुसेना दल (इंडियन एअर फोर्स ) असे करण्यात आले. १९३२ ला स्थापन झालेल्या या वायुसेना दलाचे शौर्य कौशल्य आणि समर्पणामुळे भारताने जगभरात एक आगळे - वेगळे स्थान निर्माण केले आहे, भारतीय वायुसेना दलाचे ब्रीदवाक्य नभ स्पृंश्य दिप्तंम (तेजस्वीपणे आकाशाला स्पर्श करा) असा त्याचा अर्थ होतो. भारतीय वायुदल हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली वायुदल मानले जाते, अनेक अत्याधुनिक विमानांनी वायुदल सज्ज असुन राष्ट्रीय आपत्ती, नैसर्गिक संकटे तसेच सीमा वरती भागात संरक्षणात्मक कारवायांमध्ये वायुदलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते,आज एअर फोर्स दिनानिमित्त देशभरातील नागरिक व जवान सर्व वीरांना सलाम करत आहेत, त्यांच्या या पराक्रमामुळे आज आपले आकाश सुरक्षित आणि गौरवशाली आहे, आज आपण सर्व ज्येष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक मोठ्या हिरीरीने सहभाग घेऊन हा दिवस साजरा करत आहोत त्यामुळे याची आजच्या पिढीला मोठी प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर कृष्णा सरदार, पोलीस संघटनेचे माजी अध्यक्ष संजय भोंडवे, संग्राम यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , संग्रामजीत यादव , अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे, भगिरथ पवार,शरद तांबे, छायाताई मोटे, गोविंद जगदाळे, घनश्याम मिसळ , कासार, सिन्नरकर , राजू शिंदे, रामदास वाणी असलम शेख ,अनिल लगड, पोलीस संघटनेचे माजी अध्यक्ष संजय भोंडवे, शिंदे, किशोर भोसले मोरे तसेच ५७ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी चे अनेक कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर बाळासाहेब बनकर यांनी तर आभार प्रदर्शन मेजर अनील लगड यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

क.जे.सोमैया शालेय व्यवस्थापन समन्वय समितीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न


-  श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 हिंद सेवा मंडळाच्या करमशी जेठाभाई सोमैया हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण विभाग, व शासकिय विभागांनी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा स्तरावरील विविध समित्यांची एकत्रित सभा घेण्यात आली. शाळा व्यवस्थापन सामिती, परिवहन समिती, माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना सामिती, पालक शिक्षक संघ, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, तक्रार पेटी, महिला तक्रार निवारण समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती, तंबाखु सनियंत्रण समिती या समित्यांची एकत्रित सभा अतिशय उत्साहात व खेळीवमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . या सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेशशेठ ओझा होते . प्रमुख पाहुणे विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड,कनिष्ठ महाविघालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल शालेय समिती सदस्य किशोर फुणगे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, सुर्यकांत कर्नावट उपस्थित होते . विद्यालयाचे मुख्याध्यापक भूषण गोपाळे यांनी सर्व समित्यांचे पदाधिकारी यांचे स्वागत करून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . सर्व समिती प्रमुख यांनी समितीचे कार्य व माहिती सर्व सदस्यांना दिली . विद्यालयाचे चेअरमन यांनी या सभेत आपले विचार प्रकट केले . त्यांनी विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवता वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे अवाहन केले . या सभेला सामिती सदस्य अशोक दिवे, उमेश तांबडे, आशीष कर्नावट, डॉ. गोरख बारहाते, दिप्ती आमले, प्राची फरगडे, डॉ. प्रशांत खैरनार, पद्माताई भुतडा, रोहीणी पवार,, अमोल धाडगे, रंजना धनगे आदी उपास्थित होते . या सभेचे सुत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक कल्याण लकडे यांनी मानले.सभेची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथीलस्टेट बँकचे नवाज देशमुख यांची


शिर्डी आरबीओ ‘रिजनल
सेक्रेटरी’ या पदावर निवड 

- अजिजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) शाखा प्रबंधक म्हणून कार्यरत असलेले नवाज अल्लाबक्ष देशमुख यांची राहाता तालुक्यातील शिर्डी येथील रिजनल बिझनेस ऑफिस (RBO) येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ या महत्वाच्या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राहुरी व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. देशमुख हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत कार्यरत असून त्यांनी बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ शाखेत त्यांच्या कार्यकाळात ग्राहकाभिमुख सेवा, तत्पर प्रतिसाद आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे शाखेचे कामकाज अधिक गतिमान झाले. त्यांनी ग्राहक समाधानावर भर देत बँकेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची शिर्डी आरबीओ येथे ‘रिजनल सेक्रेटरी’ या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे राहुरी तसेच विद्यापीठ परिसरातील ग्राहकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशमुख यांनी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “भारतीय स्टेट बँकेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पेलविण्याचा प्रयत्न करीन. ग्राहकसेवा हीच माझी प्राथमिकता राहील,” असे ते म्हणाले. त्यांच्या या यशाबद्दल राहुरी कृषी विद्यापीठ स्टेट बँकेच्या शाखेचे अधिकारी प्रवीण रक्ताटे, प्रतीक अभंग, कर्मचारी रामदास मामा उनवणे, चंद्रकांत साळवे मेजर, बा.नांदुर येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र कोहकडे यांनी सत्कार करत देशमुख साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या नियुक्तीमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारतीय स्टेट बँक शाखेचा गौरव अधिक उंचावला आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
पत्रकार जावेद शेख - राहुरी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================