अहमदनगर - जिल्हा - माहिती -कार्यालय - वृत्तसेवा
जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये ३ जुलै २०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी ३ जुलै २०२३ रोजीच्या रात्रीचे १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी, व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास व पाच पेक्षा तास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना हा आदेश लागु राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment