राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 5, 2024

अजून किती निर्भया...


बलात्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाटलं होत निर्भया नंतर तरी . पूर्णविराम लागेल, परंतु निर्भयानंतर स्वल्प विरामच लागत गेले, याला पूर्णविराम लागणार तरी कधी ? वारंवार असे का घडत आहे? निर्भयाचे नाव बदलते ,पण तिचे मरण थांबत नाही. आणखी अजून किती निर्भया पहायच्या?
चार वर्षांपूर्वी दिल्लीतील निर्भया नावाच्या तरुणीवर अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने कठोर कायदे तर केलेत पण त्यानंतरही बलात्कार थांबले नाहीत. अशाच घटना आज रोज घडतांना दिसत आहेत. ताजी बात‌मी आहे. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवरील नृशंस बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या वेदना आणि याचा संताप लोकमानसात कायम असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले. कोलकाता, बदलापूर आणि अन्य ठिकाणी घडणाऱ्या बलात्कार अत्याचाराच्या घटना अत्यंत शरमेच्या आहेत. या गुन्ह्यांचे स्वरूप आता अधिक भेदक, नृशंस आणि अमानूष होत चालले आहे . दरवेळी अशी एखादी घटना घडल्यानंतर शासन आणि समाज जागा होतो. पण अशाप्रकारचे कृत्य घडू नये, यासाठी उपाययोजना का केल्या जात नाहीत? 
अलीकडील काळात
 बालिका, तरुणी आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.
मणिपूर कोलकाता, बदलापूर आदी ठिकाणी घडलेल्या अत्याचाराच्या घटनानंतर तेथील शासनकर्त्यांकडून "आम्ही आरोपीला कठोर शिक्षा करू" अशा प्रकारची वेगवेगळी वक्तव्ये केली जातात, पण ही सर्व प्रक्रिया गुन्हे घडून गेल्यानंतर केली जाते. परंतू प्रत्यक्षात अत्याचाराचे गुन्हे घडू नयेत यासाठी भरीव काहीतरी करण्याची गरज भासत आहे . परंतू त्यादृष्टीने शासनाने कोणते धोरण आखले आहे का किंवा त्यासाठी काही पावले टाकली जात आहेत का? हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे? हे लक्षात घेता शासन आणि समाज यांनी अशी घटना घडू नयेत, यासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. पण पण तशाप्रकारचे ठोस प्रयत्न अथवा कृती होताना आपल्याला का दिसत नाही , निर्भयानंतर आजपर्यंत बलात्कार होऊ नयेत, यासाठी कोणतेच प्रयत्न होताना का दिसले नाहीत, बलात्कार अत्याचार, लैंगिक शोषण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत?
देशाच्या स्वातंत्र्याला आज ७७ वर्षे पूर्ण झाली.
पण तरी देखील आज महिलांवरील अत्याचार थांबले आहेत का? किंवा महिला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून. विचार केला जातोय का ? महिलांसाठी सुरक्षित समाजाची निर्मिती करू शकलो का? याचे उत्तर नकारार्थीच भेटेल ही शोकांतिका म्हणावी लागेल, आपण पाहतोय, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी असंख्य भाषण बाजी झाली कायदेबदल झाले, नव्याने कायेद केले गेले आणि देशातील महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत असे सांगित‌ले गेले, पण त्या खरोखरच सुरक्षित कशा होतील याकडे शासण का लक्ष घालत नाही..
मुळात अत्याचाराच्या घटनांकडे आणि महिलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यामध्ये आपल्याला अपयश आले का ही क्रूर मानसिकता बदलण्यासाठी आपण काही करायला नको का? सांगण्याचा मुद्दा इतका की. बालिकांवरील, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, महिलांनी स्वतः पुढे येऊन
तक्रारी नोंदविणे गरजेचे आहे, लहान मूलांबाबतीत असे घडल्यास त्यांच्या पालकांनीही कोणतेही समाजभय न बाळगता या प्रवृत्तींना लगाम बसावा यासाठी प्रयत्न केले पाहिले. एखादी महिला स्वत:वर झालेल्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी कधीच पुढे येत नाही, परंतू ती न्याय मिळावा या आशेने न्यायालयाचा उंबरठा चढली तरी तिच्या पदरात फक्त निराशाच पडते. शिवाय ज्या स्त्रिया बदनामीच्या भीतीपोटी तक्रार दाखल करत नाहीत त्यांच्यासाठी सरकारकून विशेष समुपदेशन मोहीम राबविले जाणे गरजेचे आहे.
सूरक्षेच्या संद‌र्भात कोणी पावले उचलली तर सरकार सहकार्य करत नाहीत, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलेही उचलणे गरजेचे आहे.

दाहि दिशांत भारताच्या, रोजच अत्याचार किती
दृष्ट हैवान जिकडे तिकडे भारत कसा घडायचा
अजून किती निर्भया जातील बळी देशामध्ये
फक्त वाहून अश्रु आता, हा प्रश्न नाही सुटायचा ..
 आपला देश खुप प्रगती करत असूनही देशातील मुलींसाठी लोकांची विचारसरणी मागासलेली आहे,
सध्या चे उदाहरण घ्यायेचे झाले तर आपल्याकडे वेगवेगळ्या स्त्री देवता आहेत ज्यांच्या प्रतिमांची समाज भक्तीभावाने पूजा करतो, पण देव माणसातच आहे ही गोष्ट मात्र विसरून जातो. मग त्या स्त्री चे काय जी काम करू लागली व्यक्त होऊ लागली, यशाची शिखरे गाठू लागली, तिचा मात्र समाजाला जाच वाटू लागतो, मग ती कसे कपडे घालते, कुठे जाते, किती वाजता जाते, कुठे काम करते, कोणासोबत फिरते, कोणाच्या विरोधात ती आवाज उठवते या सर्व गोष्टींचे मूल्यमापन सूरु होते आणि त्यातून अंतिमतः तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. हे वास्तव आपण कधी बदलणार?
          महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून दिड हजार रूपयांमध्ये महिलांचे तोंड गोड केले जाते, पण महिला सूरक्षित राहून त्यांचे आयुष्य कधी गोड होणार? तिला समाजामध्ये मूक्तपणाने कधी वावरता येणार? आजकाल तर मूलींना घरातून बाहेर पडायची देखील भिती वाटते की आज सकाळी जाऊ, पण दिवसभरात कोणत्या
परिस्थतीला सामोरे जाऊन घरी सूखरूप येऊ की नाही... हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित राहतो? आपण कथी सूरक्षित होऊ, ही भीती त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कायम असते. निष्पाप चिमुकल्यां विकृत लोकांच्या शिकार बनत आहेत ,ही घसरलेली नैतिकता पाहिली तर महिलांवरील अत्याचार हे सर्वात मोठे आव्हान समाजापुढे उभे ओहे. पण विचार करायला कुणाला वेळ आहे? धकाधकीच्या आयुष्यात आपण बरेच काही हरवून बसलो आहोत. राजकारणही नासले आहे, समोर आदर्श नसलेल्या वातावरणात तरुणांना आवरणार कोण?
मला ऐवढेच सांगायचे आहे. नवीन कायदे निर्माण करण्यापेक्षा जे आहेत जे ते तरी व्यवस्थित दिल्या पाळले गेले पाहिजेत. कायदे .आस्तित्वात असून उपयोगाचे नाही, त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी देखील झाली पाहिजे.
'स्त्री' कडे बघण्याचा वाईट दृष्टीकोण बदलला पाहिजे, जोपर्यंत हा दृष्टीकोण बदलत नाही तोपर्यंत हे थांबणे शक्य नाही. आणि म्हणून उपायाच्या दृष्टीने विचार करता, प्रत्येक आई - वडीलांनी आपल्या मूलांसोबत बिनधास्तपणे संवाद साधण्याची गरज आहे. मुलांसोबत प्रत्येक विषयावर संवाद साधल्यावर त्यांच्या विचारांचा मार्ग कुठे जात आहे. हे लक्षात येईल, संवाद साधला की प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नांना योग्य उत्तर मिळाले की चांगला मार्ग मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिले जावे त्याने मूलांमधील क्रोध , द्वेश, राग, विभत्स विचारांना सात्विक विचाराकडे वळवण्यास मदत होईल...

=================================
-----------------------------------------------

*लेखन*✍️✅🇮🇳...
समिक्षा चंद्रकांत चव्हाण
तारळे जि.सातारा
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, November 4, 2024

निस्वार्थी मनाच्या शीतल चांदण्यात


माणसाला रोजच्या दैनंदिन कामकाजाच्या चक्रातून थोडं बाहेर पडावं व काही वेळा पुरतं तरी मुक्त व्हावं असं वाटत असतं.थोडक्यात, थोडी बदलाची आवश्यकता असते. मलाही अशाच बदलाची गरज होती .रोज सकाळी लवकर उठून उरकून ८ वाजता कामावर हजर होणं, रोजचा प्रवास..... अगदी कंटाळा आला होता....
झोप पुरेशी न झाल्याने वैतागलेल्या स्थितीमध्ये माझा प्रवास सुरू होता. कामावर जायला आज खरंतर थोडा उशीरच झाला होता. रोजच्या त्याच त्याच रुटीनला कंटाळून मी कामावर जात असताना माझं लक्ष रस्ता झाडणार्‍या स्त्रियांवर पडलं. किती लवकर उठून यांना यावं लागत असेल? आपला दिवस सुरू होण्याआधी यांचा दिवस सुरू झालेला असतो. यांना सुद्धा लवकर उठण्याचा, रोजच्या दैनंदिन चा कंटाळा येत नसेल का? त्यांचं काम स्वच्छ होतं. एकमेकींना सोबत करत ते समोरील काम पार पाडत होत्या. स्वच्छ रस्ता आत्ता चकाकत होता. त्या चकाकणाऱ्या रस्त्यावरून जाताना माझ्या मनावर असलेला ताण, वैतागलेपणा दूर झाला. त्या स्त्रियांची कामावरील निष्ठा, प्रेम त्या चकाकरणाऱ्या रस्त्यावरून प्रतिबिंबित होत होतं....
              प्रत्येकाचं आपल्या कामावर प्रेम हवं, निष्ठा हवी, श्रद्धा हवी. वाचनालयासमोरील देवळातील गणपतीची मूर्ती जेव्हा मी पाहते त्यावेळी मला फक्त ती मूर्ती दिसत नाही तर तिथे ज्या ज्येष्ठ वयातील स्त्रिया सेवा देण्यासाठी येतात त्यांची सेवा दिसते. पहाटे ६ ते ८ या वेळेमध्ये या स्त्रिया एकत्र येतात. सडा, रांगोळी ,पूजा ,हार करणं, स्तोत्रपठण व आरती करणं ,प्रसादाची तयारी करणं इत्यादी कामे अगदी अविरत चालू असतात. ऊन असो ,थंडी असो व पाऊस असो त्यांची सेवा चालू असते त्यांचं श्रद्धास्थान अढळ आहे आणि त्यांनी केलेली सेवा ही देवाला देवपण देते. प्रत्यक्ष देवाला कोणीही पाहिलेले नाही. पण माणसातील देव आपल्या भेटीला येतो. त्या स्त्रिया मन लावून आपलं काम करतात. एक एक फुल वेचून त्यांनी गणपतीसाठी बनवलेला हार हा गणपतीचे सौंदर्य अजून वाढवतो. या सर्व स्त्रियांची सेवाभावी वृत्ती देवळातच नाही तर आजूबाजूलाही एक सकारात्मक ऊर्जा पसरवते. 
  आपण जेव्हा अशी उदाहरणे पाहतो की ,जी आपल्या डोळ्यांसमोर घडत असतात. ती आपल्याला प्रेरणा देत असतात. आपल्याला अनेक सामाजिक बांधिलकीची जबाबदारीची जाणीव करून देतात.
एक रिक्षावाले काका दररोज दुपारी ४ नंतर बिस्किटांचे पुडे घेऊन येत व दररोज ,अगदी नित्यनेमाने त्या कुत्र्यांच्या पिल्लांना खाऊ घालत. हे दृश्य मी जवळजवळ रोज बघत होते आणि निरीक्षणही करत होते. पिल्लांनाही आता त्या काकांची सवय झाली होती. ती पिल्ले ठराविक वेळ झाली की आतुरतेने त्यांची वाट पाहत बसत. कधी कधी काकांना कामामुळे उशीर होई पण त्यातूनही वेळ काढून ते येत व पिल्लांना खाऊ घालीत. काकांना उशीर झाला तर पिल्लांच्या डोळ्यात भेटीची आतुरता दिसे व आल्यावर भेटीचा आनंद.हेच खर निस्वार्थी प्रेम. आपल्या एका छोट्या कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला आनंद होत असेल तर तो आनंद समोरच्याला मिळवून देणं, त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरवणं खूप सुंदर गोष्ट आहे. या अशा निस्वार्थी प्रेमात एकमेकांबद्दल कोणत्याही ,कसल्याही अपेक्षा नसतात. दोघांमध्ये फक्त एक निखळ प्रेमाचा झरा वाहत असतो. 
             मुक्या जीवांबाबत प्रेम असणं, कणव असणं ,दयाभाव असणं, हे माणसाचं 'माणूस'असण्याचे लक्षण आहे. गौतम बुद्धांची शिकवण आपल्याला हेच तर शिकवते. 
लहान मुलांना घडवताना आई-वडिलांनी दिलेले संस्कार फार महत्त्वाचे असतात. एक चांगली व्यक्ती घडण्यासाठी ते फार महत्त्वाचे असतात. असाच एक प्रसंग माझ्यासमोर घडला. कामानिमित्त जात असताना मला एक गाढव दिसलं. त्याच्या गळ्यातील बांधलेला दोरखंड एका हातगाडीच्या दांड्यात अडकला होता. ते गाढव सुटका करण्यासाठी धडपडत होतं. एक छोटा मुलगा व मुलगी तो दोरखंड सोडवत होते आणि आजूबाजूला असलेली मोठी माणसं ढुंकूनही न पाहता निघून जात होती. जणू आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. ती मुले न घाबरता त्या गाढवापाशी आली. व त्या हातगाड्याच्या दांड्यामधून दोरखंड काढू लागली. थोड्या प्रयत्नानंतर त्या मुलांनी त्या गाढवाला मोकळं केलं. या लहानग्यांना बघून माझे डोळे पाणावले. आपण लहान आहोत, आपल्या सोबत कोणीही मोठे माणूस नाही त्या गाढवाने अचानक हल्ला केला तर आपल्याला लागेल . असे भीतीदायक विचार त्या लहानगांच्या मनात क्षणभर सुद्धा आले नाहीत. ते वयाने लहान असले तरी त्यांचं मन मात्र मोठ्ठ निघालं. त्यांच्यावर झालेले संस्कार पक्के निघाले. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला 'माणूस 'म्हणून घडता येतं...
एक मोठे नामांकित प्रतिथयश डॉक्टर त्यांची आज या निमित्ताने आठवण झाली. वाई येथील डॉ.शरद अभ्यंकर असेच एक निर्मळ मनाचे परोपकारी व्यक्तिमत्व होते. दानशूर व्यक्तीमत्व,मोकळा स्वभाव, वाचनाची प्रचंड आवड असणारे एक सद् गृहस्थ.ज्ञानी व आर्थिक सुबत्ता असली तरी त्याचा त्यांना कसलाही अहंकार नव्हता.त्यांनी खूप जणांना मदत केली अगदी उदार होउन. एके दिवशी एक मुलगा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आला.तो डॉक्टरांना भेटला व रक्तदान करण्यासाठी आलो आहे असं म्हणाला.रक्तदान करून थोडे पैसे मिळावे या हेतूने तो आला होता.एका गरीब कुटुंबातील हा मुलगा दहावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी पैसे जमा करत होता.नोकरी करत शिक्षण घेऊन आपल्या पायावर लवकर उभं रहावं म्हणून त्याची प्रामाणिकपणे धडपड सुरू होती.आत्ता सध्या तातडीची आवश्यकता असल्याकारणानें तो रक्तदान देण्यासाठी आला होता.डॉक्टरांनी त्याला काही पैसे दिले व रक्तदान करण्याची गरज नाही असे बोलले.डॉक्टरांनी एक दोन ठिकाणी बोलून एका ठिकाणी त्याला नोकरी मिळवून दिली.शिक्षण घेत आता तो नोकरी करु शकत होता.अधूनमधून सुट्टी असेल त्यावेळी तो डॉक्टरांना भेटत असे व तिथे वेळप्रसंगी मदतही करत असे.डॉक्टरांनी अशी अनेक कुटुंबे सावरली, उभी केली. याच डॉक्टरांनी केलेल्या अनेक कामांतील आणखी एक घटना इथे सांगाविशी वाटते.आसपासच्या परिसरात कातकरी समाजातील माणसे रहात होती.मासेमारी , खेकडे पकडून विकणे, छोटीमोठी कामे करणे ....अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालू होता.काही लागलं,खुपलं , आजारी पडलं तर ते डॉक्टरांकडे येत.डॉक्टर घेतली तर नाममात्र फी घेत कारण कातकरी अशिक्षीत असले तरी स्वाभिमानी होते.या माणसांना डॉक्टरांविषयी आदर होता ,अभिमान होता. याच समाजातील अवघडलेल्या स्त्रियांची बाळंतपणं डॉक्टरांनी मोफत केली तसेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाही असा हा देवमाणूस मी माझ्या डोळ्यांनी पाहिला.अनेक प्रसंगांतून त्यांची आठवण सदैव येत राहते.मदत केलेली काही माणसे जाण ठेवतात ,काही ठेवतही नाहीत म्हणून आपला चांगूलपणा आपण सोडायचा नसतो.
 आपण प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तींना बघतो आणि प्रेरित होतो. काही काही लोक तर त्यांच्या नशिबाचा हेवा करतात. परंतु ,त्या प्रसिद्धीसाठी नशीब कारणीभूत आहे का? त्यामागील त्यांच्या परिश्रमांना काहीच बोल नाही का? त्यांनी घेतलेले अपार कष्ट ,मेहनत ,संकटांविरूध्द ठामपणे लढून ते 'त्या ' स्थानावर आलेले असतात. अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीला दोन वेळा जवळून भेटण्याचा मला दुग्धशर्करा योग आला. पद्मभूषण ,पद्मश्री पुरस्कार प्राप्त ,भारतीय सामाजिक कार्यकर्ता व लेखिका सुधा मूर्ती. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ब्रीदवाक्य त्यांना शोभून दिसते. त्या एक अभियांत्रिकी शिक्षिकाही आहेत. अभियांत्रिकी आणि लोकोमोटिव्ह कंपनी मध्ये नियुक्त केलेल्या त्या पहिल्या महिला अभियंता होत्या. त्यांचा तो तिथपर्यंतचा प्रवास खूप खडतर झालेला आपणास दिसून येतो शिक्षक असल्याने त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले तसेच अनेक सामाजिक कार्यात आपले मोलाचे योगदानही दिले. त्यांनी लिहिलेल्या गोष्टी माणसांच्या,तीन हजार टाके ,सामानातले असामान्य , आयुष्याचे धडे गिरवताना इत्यादी अशा अनेक पुस्तकांमधून त्यांचे ' ''विस्तृत कार्य 'व जमविलेले 'माणुसकीचे धन 'आपणास पाहायला मिळते आज 'त्या 'अनेकांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांना जवळून पाहण्याचे, त्यांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला लाभले. अशा अनेक व्यक्ती आपल्याला एकच तत्व शिकवतात ते म्हणजे 'माणुसकी 'व 'निस्वार्थ प्रेम'. मृत्यूनंतर जर काही शाश्वत गोष्ट शिल्लक राहत असेल तर ती प्रेम हे आहे. अशा अगणित व्यक्तींनी अनेकांना शाश्वत प्रेम देऊन त्यांच्या जीवनाला खोल अर्थ दिला आहे.बा.भ .बोरकरांची कविता माझ्या वाचनात आली.
मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे,
गेले तेथे मिळले हो
चराचरांचे हो‍उनि जीवन
स्‍नेहासम पाजळले हो
जीवन त्यांना कळले हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या
रस सगळे आकळले हो
आपत्काली अन्‌ दीनांवर
घन हो‍उनि जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो
खरेच ,कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता माणसात एक निरपेक्ष प्रेम नावाची गोष्ट असते. स्नेह ही खूप उदात्त गोष्ट आहे. जग तटस्थ होऊन न्याहाळले तर जीवनाच्या विविध अंगाचे दर्शन घडत असते. गौतम बुद्धांनी मैत्री भावना वृद्धिंगत होण्याला महत्व दिले आहे. मी तू पणा भेद निर्माण करतो ,पण तुझ्यात आणि माझ्यात काही वेगळे नाही ,परिस्थितीने आपण वेगवेगळे झालो असू ,पण आपण सदैव एकमेकांच्या हिताचा विचार केला पाहिजे ही भावना मन समाधानी करत जाते. अज्ञ लोकांना ज्ञानी बनवणारे जगातील करुणाशील लोक यांचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. झाडलोट करणाऱ्या कामगारापासून अनेकजण आपल्या कल्याणासाठी झटत असतात .निष्ठेने कर्तव्य करणारी ,आणि सगळ्यांचे भले चिंतणारी ही माणसे जेंव्हा निस्वार्थी असतात तेंव्हा ती मनाने खूप मोठी असतात. म्हणूनच आपण भोवताल नीट पाहून अशी माणसे मिळवून त्यांना समाधान दिले पाहिजे.त्यांचे कर्म त्यांना आनंद देते . म्हणूनच अहितकारी कर्म न करता सर्वांचे कल्याण करणारी माणसे हीच खरी तर निस्वार्थी ठरतात. दुःख समजून घेऊन दुःख निवारण करण्याचा छोटासा प्रयत्न करणारी माणसे उपयोगी ठरतात .दुःख वाढवणारी माणसे नसावीत .आधार देणारी ,प्रोत्साहित करणारी ,दिलासा देणारी ,योग्य वेळी कौतुक करणारी ,संकटात उपयोगी पडणारी ,वेळेचा सदुपयोग करणारी ,निराशा दूर करून जीवन जगण्यास उत्साह देणारी ,अशी निर्मळ निस्वार्थी माणसे जे प्रेम देऊन जातात त्यामुळेच या विश्वाला सौख्य प्राप्त होते. 
आपण दैनंदिन आपल्यात मनातल्या अनेक अंतर्गत संवेदनात मश्गुल झालेले असतो. सभोवतालचे जगात अनेक बरी वाईट माणसे भेटत असतात. जी स्वतः जाणतात की आपले आयुष्य खूप थोडे आहे ,यातच आपण चांगल्या गोष्टी करून स्वतः समाधानी व्हावे व इतरांना समाधान द्यावे. अशा व्यक्तींना अहंकार नसतो ,त्याचे मीपण नेहमीच विनम्र असते. मिळालेले जीवन बहुजन हिताय ,बहुजन सुखाय असे ते जगत असतात .त्यांच्या मनावर त्यांचे नियंत्रण असते ,ते मनाने भटकत नाहीत .चिंतनशील स्वभावाने ती माणसांची ,प्राण्यांची मने समजून घेतात .ते आळसी नसतात,ती माणसे कर्मयोगी असतात .ती साधी असतात ,ती संयमी असतात . भले कधी रागावतील पण ते देखील इतरांच्या हितासाठी.असे करुणाशील माणूसपण खरे तर प्रत्येकाच्या मनात असतेच ,पण मनाला भान देण्याचा अभ्यास झालेला नसल्याने ती स्वैर भटकतात ,कधी परिस्थितीने दबून जातात ,कधी संस्काराने माजोरी होतात.... या पार्श्वभूमीवर अशा भान हरपलेल्या मनाला सन्मार्गाला लावणारी निस्वार्थी प्रेमळ माणसे सर्वांच्या जीवनात पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल चांदणे देऊन जातात ..खरेच आपले मनही मग एक निस्वार्थी चंद्र होऊन जाते....आणि आनंदाचे टिपूर चांदणे मनात सभोवार पसरत जाते.

=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
धनश्री निंबाळकर
एम.ए.भाग २, मराठी विभाग
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११
----------------------------------------------
=================================


Sunday, November 3, 2024

संत लोयोला चर्च आयोजित पवित्र माळेच्या भक्तीची चर्च प्रांगणात सांगता


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दरवर्षी संपूर्ण ऑक्टोबर महिना कॅथोलिक भाविक पवित्र मरीयेची विशेष आराधना करतात,याही वर्षी प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा. प्रकाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मग्रामातील विविध लहान ख्रिस्ती समूह व पॅरिश कौन्सिलच्या सेवक प्रतिनिधींनी एकत्र येऊन पवित्र माळेच्या भक्तीचे उत्तम नियोजन केले होते. 
महिनाभर चालणाऱ्या या भक्तीची लोयोला सदन चर्चच्या प्रांगणात नुकतीच सांगतात करण्यात आली. समारोपा प्रसंगी चर्च परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 
 पवित्र माळेनंतर पवित्र मिस्सा बलिदान विधी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख याजक म्हणून उपस्थित असणारे बेळगांव येथील धर्मगुरू रेव्ह फा. अँथोनी त्रिभुवन यांनी "धर्मग्राम एक कुटुंब" या विषयावर अर्थपूर्ण प्रवचन केले. यावेळी वेदीवरती लोयोला धर्मग्रमाचे प्रमुख धर्मगुरू फा. प्रकाश भालेराव, सेंट झेवियर्स स्कूलचे प्राचार्य फा.विक्रम शिनगारे, दिव्यवाणीचे संचालक फा.अनिल चक्रनारायण व फा. जेकब गायकवाड हे उपस्थित होते.
दरम्यान महिनाभरात प्रवचन करणाऱ्या ३१ प्रवचनकांराचा व माळेचे नियोजन करणाऱ्या महिलांचा उपस्थित धर्मगुरूंच्या हस्ते सत्कार
 करण्यात आला. लोयोला गायन मंडळाने गायलेल्या सुमधुर गीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
धर्मग्रामातील भाविकांना मारियादास आढाव व युवकांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सेंट लुक हाॅस्पिटल व कनोसा कॉन्व्हेन्टच्या सर्व धर्मभगिनी उपस्थित होत्या.
  सांगता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, जाॅन धीवर, उत्तम गायकवाड, लाजरस गायकवाड, डॅनियल साळवे, राकेश दुशिंग, प्रवीण सात्राळकर, संदीप साळवे, लुकस दिवे, रविन्द्र त्रिभुवन, लत्ता बनसोडे, मंगल दुशिंग, निर्मला अमोलीक, पुष्पा साठे , संगीता पंडित आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कमलाकर पंडित यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
रवि त्रिभुवन- श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


साहित्यिकांनी केली दिवाळीसाजरी अनाथांच्या आश्रमात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दीपावली सण आनंदाची पर्वणी असते, मानवी जीवनातील अंधार घालविणे आणि प्रकाशाचे पूजन करणे हे जीवनसूत्र या सणाच्या मुळाशी आहे, याच ध्येयांनी साहित्यिकांनी ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांच्या अनाथांच्या आश्रमात साजरी केली.
  श्रीरामपूर  - बेलापूर रोडवरील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात साहित्यिकांनी दिवाळी पाडवा सण विविध उपक्रम आणि देणगीद्वारे साजरी केली. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दीपावली सणाचे महत्त्व सांगत संतांचे आणि साहित्यिकांचे कार्य हें ज्ञानदीप लावू जगी असे आहे. साहित्यिकांच्या लेखनात आणि मनात संतत्त्व, साधुत्त्व असले पाहिजे. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांचे अनाथांच्या कार्याला देवत्वाची प्रचिती आहे. त्यांना सहकार्य लाभले तर त्यांच्या देवकार्याला गती मिळेल अशी भावना व्यक्त करून साहित्याचे महत्वही सांगितले विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी कृष्णानंद महाराज यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून मायेच्या मायेने दुर्लक्षित अनाथ मुला मुलींना आधार दिला, शिक्षण देत आहेत, चांगले संस्कार करीत आहेत हे कार्य पुण्यशील आहे, असे सांगून श्रीरामपूरच्या साहित्यिकांचा हा वेगळा दिवाळी पाडवा असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, साहेबराव सुकळे यांनी आश्रमातीत कार्याचे कौतुक केले. यावेळी सौ. सुरेखा बुरकुले, संजय बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, सुयोग बुरकुले, सुबोध बुरकुलेसह आश्रमातील मुले उपस्थित होते. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी सर्वांचे स्वागत करून हा आश्रम सदगुणी मायबापांच्या आधारातून आकाराला आला आहे, अनाथांच्या सहवासात साहित्यिकांनी दिवाळी साजरी केली, याबद्दल आनंद व्यक्त केला. सुखदेव सुकळे यांनी किराणा सामान दिले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कपडे दिले, बाळासाहेब बुरकुले यांनी दोन हजार रुपये तर प्रा. बारगळ यांनी दीड हजार रुपये देणगी दिली. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग - ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



भोकर - आशांकुर संस्थेत दिपावलीनिमित्त महागुरुस्वामींच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नासिक धर्मप्रांतात दिपावली व भाऊबीज सण हा प्रथमच भोकर येथील आशांकुर संस्थेत साजरा करण्यात आला.लहान मुले ही महत्वाची मुले आहेत.कारण काहींना शिक्षण घेता येत नाही.काही घेतात.हा सण साजरा करताना नासिक धर्मप्रांत बिशप या पदावर असताना माझा मुख्य उद्देश असा आहे की, या यंदाच्या मुलांना चांगले मार्गदर्शन दिले की चांगले नागरिक होतील.हे सांगता येत नाही की बहुतेक शिक्षण झाल्यावर आमची मुले प्रधानमंत्री,मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री,आदी होऊ शकतात ते नाही झाले तर समाजात मुले चांगली नागरिक व्हावीत.म्हणून हा दिवाळी सण पहिल्यांदा आमच्या धर्मप्रांतात साजरा करीत आहोत.या संस्थेत आलो मुलांना मार्गदर्शन केले. त्यांचेशी संवाद साधला.चांगला अभ्यास करावा.मोबाईलचा वापर कमी करा.असे सुचविले यानंतर दुसऱ्या धर्मग्रामात सुद्धा साजरा केला जाईल असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना प्रेरणा,प्रोत्साहन देणारे नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा रे डॉ.बार्थोल बरेटो यांनी आशाकुर या संस्थेत केले. प्रारंभी दीप प्रज्वलन महागुरूस्वामी रा,रे डॉ बार्थोल बरेटो,संचालिका सिस्टर प्रिस्का,फा.संतान, सिस्टर सविता, अतुल, आदींच्या हस्ते झाले प्रास्तविक सिस्टर प्रिस्का यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रम सादर केले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दिपावली सणानिमित्त शालेय साहित्य व भेटवस्तू महागुरुस्वामी डॉ बरेटो,सि.प्रिस्का,फा संतान रॉड्रीग्ज,फा फ्रान्सिस ओहोळ,यांच्या हस्ते देण्यात आल्या.यावेळी हरिगाव प्रमुख धर्मगुरु फा डॉमनिक रोझारिओ,सिस्टर्स अग्नेस, आश्विनी पवार, संगीताताई, कल्पना,सि.रिटा,प्रकाश,आदी उपस्थित होते.सूत्र संचालन रेखा थोरात यांनी तर आभार प्रदर्शन फा. संतान यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग - ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Saturday, November 2, 2024

वीज तारेच्या घर्षणाने ऊसाला लागली आग,सात एकर ऊस जळून खाक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथे वीजेच्या तारीचे घर्षण होऊन सात एकर ऊस जळून खाक झाला आहे, वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सिताराम पवार यांच्या मालकीचे वडाळा महादेव - खोकर शिवारात गट नं २३३ क्षेत्र असून सदर ठिकाणी ऊस लागवड केलेली आहे सदरचे ऊसाचे पिक हे जोमात असुन परिसरातील शेतीमधून विजेच्या तारांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू असतो, या ठिकाणी विजेच्या तारेचे घर्षण निर्माण होऊन वीजेचे लोळ निर्माण झाले,यामुळे शेतकरी सुजित कैलास पवार तसेच प्रवीण कैलास पवार यांच्या मालकीचे सात एकर ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. 
येथील परिसरातील श्री.उघडे हे नेहमी प्रमाणे शेताशेजारून जात असताना संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला, घटनेचे गांभीर्य ओळखत श्री. उघडे यांनी तात्काळ कैलास पवार तसेच माजी सरपंच सचिन पवार, इंजि. सुजित पवार यांना घटनेची माहिती दिली तसेच आगीचे लोळ वाढत असल्याने अग्निशमन बंब यांना पाचारण करण्यास सांगितले, तसेच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेत 
आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल पवार यांनी उघडे वस्ती व सिन्नरकर आणी पवार वस्ती येथील नागरीकांना मदतीसाठी फोनवरून माहिती दिली,
मोठ्या प्रमाणावर आगीचा तांडव सुरू असल्याने अग्निशमन बंब पोहोचू पर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, काही दिवसापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे नुकसान झाल्याने येथील शेतकरी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंड तसेच कैलास पवार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना याविषयी माहिती दिली होती. वेळोवेळी माहिती देऊनही संबंधित गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ऊस शेती पिकाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने वडाळा महादेव येथील शेतकरी व नागरीकांमधून महावितरण विषयी प्रचंड नाराजीचा सूर निघत आहे.
यावेळी कैलास पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. चंद्रकला पवार, इंजि. सुजित पवार,प्रवीण पवार यांनी सदरील बाबी दुर्घटनेमध्ये प्रचंड असे नुकसान झाले असून भरून न येणारे असल्याची माहिती दिली. तसेच अनेक वेळा माहिती देऊनही टाळाटाळ करत असल्यानेच आमचे नुकसान झाले असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Friday, November 1, 2024

बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिणे चोरी करणारा श्रीरामपुर येथील सराईत गुन्हेगार जेरबंद


गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई

- माजीद खान - नाशिक -/ वार्ता -
हल्ली चोऱ्यांचे प्रमाण खुप वाढल्याचे दिसून येत आहे, एस.टी.बस अथवा इतर प्रवासी वाहनातून प्रवास करताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून (चेन सिनॅचिंग) नेणे,असे प्रमाण दिवसेंदिवस जास्त प्रमाणात घडत असल्याचे दिसून येते आहे.
नाशिक मध्ये असाच एक प्रकार दिनांक २६/१०/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टॅण्ड नाशिक येथे घडला. मुंबई ते नंदुरबार बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हे झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादयाच्या संमती शिवाय लबाढीच्या इरादयाने चोरून नेले होते, म्हणून दिनांक २६/१०/२०२४ रोजी फिर्यादी यांनी देवुन सरकारवाडा पोलीस ठाणे येथे। २६८/२०२४ भा.व्य. संहीता ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

नाशिक शहरामध्ये ठक्कर बाजार, मुंबईनाका या बसस्टॉप परिसरात गर्दी वाढत असुन या गर्दीचा फायदा घेवुन चोरटे हे प्रवाशांच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या. मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन केले होते.

सदर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे गुन्ह्याचे गांभिर्य पाहता सदर गुन्हा हा मा. पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखा युनिट क्रं.१ कडे वर्ग केल्याने गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असतांना पोहवा /१८८३ विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हे हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार करीत असुन ते दिनांक २७/१०/२०२४ रोजी ठक्कर बसस्थानक या ठिकाणी येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शना नुसार गुन्हे शाखा युनिट ०१ कडील सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि/रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार अशांनी ठक्कर बाजार बसस्थानक या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे इसम हा ठक्कर बाजार बसस्थानक या ठिकाणी येताना दिसला असता नमुद पथकाने सदर इसमास मोठ्या शिताफीने त्यास पकडले व त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल निसार पठाण, वय-२३ वर्षे, रा-वार्ड नं ०२, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन आरोपीने अटके दरम्यान गुन्ह्यांची कबुली दिली असुन आरोपीने गुन्ह्यातील गेला माल ३,५०,०००/- रूपये किंमतीची ४.५ तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहे.
१) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २४३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
२) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २५०/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
३) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २६८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे
४) सरकारवाडा पोलीस ठाणे गुर्न २०२/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
५) मुंबईनाका पोलीस ठाणे गुरनं १९३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे
असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी यास पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे. सदर आरोपीकडून नाशिक शहरातील या सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र बागुल, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, गुन्हेशाखा युनिट ०१ नाशिक शहर हे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हेमंत तोडकर, पोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रशांत मस्कड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, जगेश्वर बोरसे यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - ९५६११७४१२२
-----------------------------------------------
=================================